‘आप्पासाहेब माळी’ नगराध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तिमत्व ; शिवसेनेने संधी द्यावी : युवकांची मागणी
माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर आटपाडीतील जनतेच्या मनात एक नाव जोरदारपणे चर्चेत आहे, आप्पासाहेब (आप्पासो) माळी. लोकसहभागातून, गोरगरीब जनतेच्या सेवेतून आणि समाजकारणातून उभा राहिलेला हा चेहरा आज सर्वसामान्यांच्या मनात घर करून बसला असून तेच नगराध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार असून शिवसेनेने त्यांना संधी द्यावी अशी मागणी युवा वर्गातून होत आहे.
आप्पासाहेब माळी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता समाजहितासाठी काम केलं आहे. गावात जिथं काम थांबलं, तिथं त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. प्रशासन, जनतेचा संवाद, आणि विकास यांचं प्रभावी समन्वयन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, युवक, महिला अशा प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत असल्याने “जनतेच्या मनातला माणूस” म्हणून त्यांची ओळख झाली आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाशी समान वागणूक देणारे, लोकांमध्ये मिसळून राहणारे आणि “आपल्यातलेच” असे वाटणारे आप्पासाहेब माळी हे जनतेच्या मनातील उमेदवार ठरत आहेत.
युवक वर्गात आप्पासाहेब माळी यांच्याबाबत विशेष आत्मीयता दिसून येत आहे. “आप्पासाहेब माळी यांची उमेदवारी म्हणजे आमच्या सर्व युवकांची उमेदवारी”, असा सूर युवकांमधून उमटत आहे. जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर तत्परतेने प्रतिसाद देणारे आणि अहो रात्र जनसेवेसाठी धावणारे असे त्यांचे वर्णन समर्थक करत आहेत.
आप्पासाहेब माळी यांच्या मागे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील तसेच दत्तात्रय पाटील (पंच) यांचा मजबूत पाठिंबा आहे. या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास दाखवून त्यांना नेहमीच मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येते.
शिंदे सेनेच्या माध्यमातून या निवडणुकीत ते नगराध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार म्हणून उदयास येत आहेत. युवक वर्ग, महिला मंडळे, शेतकरी संघटना, तसेच स्थानिक नागरिकांकडून त्यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत असून, “आटपाडीला खऱ्या अर्थाने काम करणारा, जमिनीवर राहणारा नेता हवा” असा सूर जनतेतून उमटत आहे.
जनतेच्या अपेक्षांना ओळखून, विकासाच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या आप्पासाहेब माळी यांच्या उमेदवारीसाठी मागणी आता अधिक जोम धरत असून, “आप्पासाहेब माळी यांना उमेदवारी म्हणजे जनतेचा सन्मान, युवकांचा विश्वास आणि आटपाडीच्या विकासाची दिशा” असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात ही मागणी कितपत गांभीर्याने घेतली जाते, हे आगामी राजकीय हालचालींवर अवलंबून असेल. मात्र, एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून आप्पासाहेब माळी यांचे नाव आता आटपाडीच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचले आहे.